छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
शहरातील गजबजलेल्या औरंगपुरा ते मिलिंद चौक या प्रमुख मार्गावर उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या खानावळी, हॉटेल्स, बिर्याणी सेंटर आणि फास्ट फूड विक्रेत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सायंकाळच्या वेळेस या परिसरात ग्राहकांची मोठी गर्दी होत असून वाहतूक कोंडी, अस्वच्छता आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. मात्र संबंधित विभागांकडून याकडे अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, या परिसरातील काही खाद्यपदार्थ विक्री केंद्रांकडे आवश्यक परवानग्या, स्वच्छतेचे निकष आणि पार्किंग व्यवस्थेबाबत अनेक त्रुटी असल्याची माहिती समोर येत आहे. काही ठिकाणी रस्त्याच्या कडेलाच खाद्यपदार्थ तयार करून विक्री केली जात असल्याने अन्नाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र याबाबत संबंधित विभागाने किती वेळा तपासणी केली आणि त्यातून काय निष्कर्ष निघाले, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, ग्राहकांकडून दुचाकी आणि चारचाकी वाहने रस्त्यावरच आडवी-तिडवी उभी केली जातात. त्यामुळे या मार्गावर दररोज वाहतुकीची कोंडी होत असून पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे. अनेकदा रुग्णवाहिका व आपत्कालीन वाहनांनाही अडथळ्यांचा सामना करावा लागत असल्याची तक्रार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, काही नागरिकांनी यासंदर्भात संबंधित विभागांकडे तक्रारी केल्या असल्या तरी प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर कारवाई झालेली दिसून येत नाही. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
नागरिकांनी उपस्थित केलेले काही महत्त्वाचे प्रश्न :
अन्न सुरक्षा विभागाने या हॉटेल्स व खानावळींची शेवटची तपासणी कधी केली?
विक्री होणाऱ्या खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत का?
सर्व व्यवसायांकडे वैध परवाने आहेत का?
रस्त्यावर होणारे बेकायदेशीर पार्किंग रोखण्यासाठी वाहतूक विभागाने कोणती पावले उचलली?
महानगरपालिकेने पार्किंगची पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे का?
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का होत नाही?
नागरिकांनी अन्न सुरक्षा विभाग, महानगरपालिका आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करून या परिसरातील परिस्थिती सुधारावी, अशी मागणी केली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्स, खानावळी आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कठोर कारवाई करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.